Pages

Thursday 21 November 2019

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत रुष्टता मोठी

त्या कातरवेळा थरथरती कधी अधरी
त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी
कितीदा आलो, गेलो, जमलो
रुसन्यावाचूनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

कधी तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे-रुसणे-रुसणे-हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मीच्या गाठी 

कधी जवळ सुखाने बसलो
दु:खात  सुखाला हसलो
कधी गहिवरलो, कधी धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा
जन्मासाठी जन्म जन्मलो,  जन्मात जमली ना गट्टी

---
गीत - बाळ कोल्हटकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - पंडित कुमार गंधर्व, वाणी जयराम
नाटक - देव दिवाघरी धावला 

Tuesday 19 November 2019

मावळत्या दिनकरा - भा.रा.तांबे

 


मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा |

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा |

उपकाराची कुणा आठवण?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा |

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा |

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा |


कवी - भा.रा.तांबे

हसलो म्हणजे - संदीप खरे


हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.

हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही.

हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते;
हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही.

हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे;
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.


कवी - संदीप खरे

खाली डोकं, वर पाय ! - मंगेश पाडगावकर


जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !


कवी - मंगेश पाडगावकर

सब घोडे बारा टक्के ! - विंदा करंदीकर


जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!


कवी - विंदा करंदीकर

जाणता राजा - समर्थ रामदास


निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥


समर्थ रामदासांनी छत्रपतींस लिहीलेल्या पत्रातून...

नसतेस घरी तू जेंव्हा - संदीप खरे


नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो.

नभ फाटून वीज पडावी
कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो.

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो.

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो.

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा,
समचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो.

ना अजुन झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो,
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो.


कवी - संदीप खरे

तुमचं काय गेलं ? - मंगेश पाडगावकर


त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?


त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?



कवी - मंगेश पाडगावकर

कुंभारासारखा गुरू नाही रे जगात - ग. दि. माडगूळकर


कुंभारासारखा गुरू नाही रे जगात
वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात

आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात

कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी
आव्यातली आग नाही पुन्हा आठवत

कुणी पुजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
देता आकार गुरूने ज्याची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतिष्ठा गुरू राहतो अज्ञात


कवी - ग. दि. माडगूळकर

खरा तो एकचि धर्म | - साने गुरुजी


खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे॥

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे॥

सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे॥

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे॥

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे॥

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे॥


कवी - साने गुरुजी

प्रेम - सुधीर मोघे


दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं


कवी - सुधीर मोघे

अशीच यावी वेळ एकदा - प्रसाद कुलकर्णी


अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले


कवी - प्रसाद कुलकर्णी

पत्र लिही पण...- इंदिरा संत


पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे
लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून

शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते
पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते


कवयित्री - इंदिरा संत

तिची का रंगते मेंदी - वैभव जोशी


तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा
तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा

जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता
जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता,
कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला
मनाचा एक कप्पा राखलेला... आपलासा

कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे
कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे,
कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे
जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा

किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी
असे जखडून नेले ती जणू की "बंदिनी",
तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा.


कवी - वैभव जोशी

ये उदयाला नवी पिढी - वसंत बापट


गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी

ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल आम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी?

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी


कवी - वसंत बापट

देह मंदिर चित्त मंदिर - वसंत बापट


देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रर्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

कवी - वसंत बापट

चुकली दिशा तरीही - विंदा करंदीकर


चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?


कवी - विंदा करंदीकर

दोन दिवस - नारायण सुर्वे


दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।


कवी - नारायण सुर्वे

या नभाने - ना. धों. महानोर


या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या - बी


गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौरचैत्रीची कशास जुनी येती
रेशमाची पोलकी छीटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

लाट उसळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळूनी लावण्य बर वहावे

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी


प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"


कवी - बी

आम्ही कोण? - मूळ कविता आणि तिचे विडंबन

आम्ही कोण? - केशवसुत 


आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके ।
देवाचे, दिधले असे जग तये आम्हांस खेळावया ॥
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया ।
दिक्कालातूनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके ॥ १ ॥

सारेही बडिवार येथिल पाहा! आम्हापुढे ते फिके ।
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूप्रती द्यावया ॥
सौन्दर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजी या ।
फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके ! ॥ २ ॥

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे ? ।
पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ? ॥
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ।
ते आम्हीच, शरण्य मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते ! ॥ ३ ॥

आम्हाला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे ।
आम्हाला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे ! ॥

मूळ कवीः कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत


विडंबन 'आम्ही कोण' ह्या कवितेचे - प्र. के. अत्रे




'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?

ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!

आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!


कवी - प्र. के. अत्रे (झेंडूची फुले ह्या कविता संग्रहातून)
[केशवसुत यांच्या "आम्ही कोण?" या कवितेचे विडंबन]

'माझे जीवन गाणे' आणि त्याचे विडंबन 'माझे जीवन खाणे '

माझे जीवन गाणे
- मंगेश पाडगावकर



माझे जीवन गाणे, गाणे || धृ ||

व्यथा असो, आनंद असू दे |

प्रकाश किंवा तिमिर असू दे ||

वाट दिसो, अथवा ना दिसू दे |

गात पुढे मज जाणे || १ ||


कधी ऐकतो गीत झर्‍यांतुन |

वंशवनाच्या कधी मनांतुन ||

कधि वार्‍यांतुन, कधि तार्‍यांतुन |

झुळझुळताती तराणे || २ ||


तो लीलाघन स्तय चिरंतन |

फुलापरी उमले गीतांतुन ||

स्वरास्वरांतुन आनंदाचे |

नित्य नवे नजराणे || ३ ||


गा विहगांनो माझ्यासंगे |

स्वरांवरि हा जीव तरंगे ||

तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन |

उसळे प्रेम दिवाणे || ४ ||


माझे जीवन खाणे (माझे जीवन गाणे चे विडंबन)
- प्रभाकर बोकील, मुंबई


माझे जीवन खाणे, खाणे || धृ ||


पथ्य असो, उपवास असू दे |

प्रकार इतुके, फिकिर नसू दे ||

वाट असो, वा ताठ 'उभ्याने' |

खात निरंतर रहाणे || १ ||


कधी झोडतो, पंचपक्वान्ने |

दंश जिभेला, कधी ठेच्यातून ||

कधी भज्यांतून, कधी वड्यांतून |

विरघळतात 'बहाणे'! || २ ||


खा, जन खा हो, माझ्यासंगे |

जिव्हेवरी हा, जीव तरंगे ||

तुमच्या मुखी, रसस्वादसुखाचे |

उसळो खाद्य-तराणे || ३ ||

अनामवीरा - कुसुमाग्रज


अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

-कवी - कुसुमाग्रज

दोन दिवस - नारायण सुर्वे


दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले.

- कवी - नारायण सुर्वे 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी - सुरेश भट


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी - सुरेश भट

Friday 15 November 2019

"गारवा" अल्बम मधील कविता : मिलिंद इंगळे

"गारवा" हा मराठीतील अतिशय प्रसिद्ध अल्बम. प्रत्येक गाण्यापूर्वी कवीने आपलं मनोगत काही ओळीत व्यक्त केलंय . त्यातील मला आवडलेल्या काही कविता ह्या ब्लोग मध्ये टाकतोय. पाउस, त्याची असलेली आतुरता, पावसाचा आणि प्रेमाचा असलेला नाजूक संबंध ह्या गोष्टी ह्या संग्रहात अचूक टिपल्या आहेत.

मिलिद इंगळे :गायक आणि संगीतकार 
१)  गारवा 

उन जरा जास्त आहे...दर वर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस घेऊन...आभाळ मनात दाटतं


तरी पावले चालत राहतात...मन चालत नाही
घामा शिवाय शरीरात...कोणीच बोलत नाही

तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतो

वारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातो
पाना फूला झाडांवरती छ्परावरती चढूंन पाहतो


दूपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळ

चक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतो
पावसाआधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...


गीतकार :सौमित्र
गायक :मिलिंद इंगळे
संगीतकार :मिलींद इंगळे



२) गारवा.....पहिला पाऊस पहिली आठवण

पहिला पाऊस पहिली आठवण...

पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलच पान

पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण



३) पाणी झरत चालले

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले...

पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत...

पाणी झरत चालले नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनारयावरती...

पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं...

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले...


४) त्याला पाऊस आवडत नाही

त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.


५) बघ माझी आठवण येते का?
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

६) पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले

थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा

- गारवा संग्रहातून साभार 


या झोपडीत माझ्या - संत तुकडोजी महाराज


लहानशा झोपडीत शांतीसुखाचा अनुभव सदैव कसा मिळतो, याचे वर्णन महाराजांनी खालील कवितेत केले आहे.

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक



क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

कवी विषयी अधिक जाणून घ्यायचे असल्यास खालील लिंक उघडा: